नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीपीसीसी) माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी (14 मे 2022) फेसबुक लाईव्ह दरम्यान ही घोषणा केली. आपल्या भाषणादरम्यान, जाखड यांनी पक्षाला शुभेच्छा देताना गुडलक आणि गुडबाय देखील म्हटले. जाखड यांच्या राजीनाम्यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करत मतभेद मिटवण्याबाबत बोलले आहेत.
काँग्रेस पक्ष नेतृत्व, अस्तित्व आणि अंतर्गत कलह अशा तिहेरी आघाडीवर लढत असताना जाखड यांचे हे पाऊल पुढे आले आहे. या संकटांवर मात करण्यासाठी पक्ष राजस्थानच्या उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिविरही चालवत आहे. चिंतन शिबिर कार्यक्रमादरम्यान जाखड यांचा राजीनामा हा काँग्रेसची चिंता वाढविणारी घडामोड असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
सुनील जाखड यांच्या राजीनाम्यावर पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून लिहिले की, “काँग्रेसने सुनील जाखड यांना गमावू नये. कोणताही मतभेद संवादाने सोडवला जाऊ शकतो.” 2017 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर जाखड यांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष बनवले होते. जाखड हे लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत आणि पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
सोमवारीच पक्षाच्या शिस्तभंग कृती समितीने सुनील जाखड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आणि माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे जाखड यांना ही नोटीस देण्यात आली आहे. मात्र, नोटीसला उत्तर न देता सुनील जाखड यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर सुनील जाखड यांनी चरणजीत सिंह चन्नी हे पक्षासाठी ओझे असल्याचे म्हटले होते आणि मुख्यमंत्रीपदासाठी चन्नी यांच्या नावाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर सुनील जाखड हे मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे मानले जात होते.