Raj Thackeray on Manohar Joshi। राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मनोहर जोशी यांच्या निधनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं Raj Thackeray on Manohar Joshi।
पोस्टमध्ये “मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.” असे म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.