मुंबई – राज ठाकरे यांनी सरकारला भोंग्यांच्या संदर्भात दिलेली मुदत उद्या म्हणजे बुधवारी संपत आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. खुद्द राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज आता काय करणार अशी चर्चा होती. मात्र यासंदर्भात राज ठाकरे यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.
देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणे सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.
रस्त्यावर नमाजासाठी बसणे आणि वाहतूककोंडी करणे,हे कोणत्या धर्मात बसते? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढेच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानच दिले जाईल.
हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही – हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी.
पोलिसांना केली विनंती
कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवावा. हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन,शाळा,रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते?
नागरिकांना आवाहन
– त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.
– सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि
– स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.
– मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या क्रमांकावर सजग नागरिकांनी
– दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी.