औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 1 तारखेला होणारी सभा राज ठाकरे यांच्या भाषणा अगोदरच गाजते आहे. या सभेला परवानगीच मिळून नये, येथपासून ते सभा उधळून लावू असे अनेक इशारे आणि मागण्या झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर अखेर सभेला सशर्त परवानगी देण्यात आली असल्यामुळे आता शांततेत सगळे पार पाडण्याची जबाबदारी यंत्रणेवर असणार आहे. मात्र मनसैनिकांनीही शांततेत यायचे आणि शांततेत परत जायचे असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी ज्या अटी घातल्या होत्या, त्यात पंधरा हजारपेक्षा जास्त गर्दी जमवता येणार नसल्याची अटही होती. मात्र येणाऱ्या सैनिकांना रोखू शकत नाही असे नमूद करत ती अट उडवून लावली असल्याची स्थिती आहे. असे असले तरी कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजीही पक्षाच्या पातळीवर घेतली जात असल्याचे नांदगावकर यांच्या विधानावरून दिसते. ज्यांनी सभेला विरोध केला आहे, त्यांचा विरोध कशासाठी आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र आम्ही शिवजयंती आणि आंबेडकर जयंतीही तेवढ्याच उत्साहात साजरी केली याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी किंवा सभा झालीच तर त्यात अटींचे कठोरपणे पालन होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी करणारी एक याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.