मयूर सोनावणे
सातारा -अगदी धोम जलाशयापासून तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या कळंबे गावापर्यंत कृष्णा नदीपात्राचे वाळू माफियांनी वस्त्रहरणच सुरू केले आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या वाळू उपशाकडे महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तहसीलदार, प्रांतांनीसुद्धा दुर्लक्ष केले आहे. एखाददुसरी कारवाई होत आहे, मात्र ती कशासाठी याचे गौडबंगाल कायम आहे. त्यामुळे आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकाराकडे लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात तसेच वाई तालुक्यातही अनेक ठिकाणी सुरु असलेली बांधकामे ठप्प झाली होती. मात्र, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम शिथिल करुन या बांधकामांना काही अटींसह परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाई तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रात जागोजागी वाळूमाफियांनी आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्यावेळी उत्खनन करुन पहाटेच्या वेळी अगदी महामार्गावरुनही वाळूची सुसाट वाहतूक सुरु आहे. योगायोगाने करोनामुळे महामार्गावर तसेच अनेक ठिकाणच्या गावांमध्येही पोलिसांसह महसूल विभागाचेही कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत.
या राखणदारांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांकडून वाळूची वाहतूक सुरु आहे. मात्र वाळू वाहतूक करणारी ही वाहने अडविण्याचे धारिष्ट्य पोलिसांसह महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होत नाही. त्यामुळे ही यंत्रणा महसूल विभागासह पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
दरम्यान, महसूल तसेच पोलीस प्रशासनाने वाळूच्या वाहनांवर काही ठिकाणी एखाद दुसरी कारवाई केली असली तरी संबंधित वाळूमाफियांकडून या कारवाईला न जुमानता आणखी जोमाने वाळू उपसा सुरु केला आहे. त्यामुळे या कारवाया अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी करण्यात आल्या होत्या की आणखी कशासाठी हो शो केला जातो, याबाबतची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे कृष्णाकाठच्या अनेक गावांमधील नागरिकांकडून संबंधित गावकामगार तलाठी, सर्कल तसेच पोलिसांना अवैध वाळू उपशाबाबत माहिती दिली जात आहे. मात्र, तरीही “हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. त्यामुळे तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरश: धुडगुस घातला आहे.
वाई तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात जागोजागी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाळू उपसा सुरु आहे. या वाळूउपसा करणाऱ्या माफियांवर प्रशासनाचा कसलाही धाक राहिला नाही. आर्थिक तडजोडी आणि राजकीय व्यक्तींचे पाठबळ यामुळे हे वाळूमाफिया चांगलेच सोकावले आहेत. प्रशासनाकडून जरी कारवाईचा बडगा उगारला तरी कारवाई थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून मध्यस्थी केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील वाळूमाफिया भलतेच मुजोर झाले आहेत.
आता जिल्हाधिकाऱ्यांवरच मदार
वाई तालुक्यातील वाढत असलेल्या अनधिकृत वाळू व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहेत. कोणत्याही प्रकारचे ठेके नसणारेही कृष्णा नदीपात्रांसह गावालगतचे ओढे वाळूसाठी पोखरु लागले आहेत. वाळूमाफियांचा वाढत झालेला धुडगूस आता तालुक्यातील महसूल विभागाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातच राजकीय पाठबळामुळे या वाळूमाफियांना कोणताही लगाम राहिलेला नाही. त्यामुळे दरारोज कृष्णेवर सुरु असलेला अत्याचार रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणे गरजेचे मानले जात आहे.