मुंबई – राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे रॅकेट, तसेच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे. मुख्यमंत्री जर इतक्या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं करावे, असे फडणवीस म्हणाले. यावर आता राज्यपालांवर आम्ही टीका करणारच, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
पत्रकरांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’वारंवार राजीनाम्याची, सरकार बरखास्तीची मागणी केल्याने विरोधी पक्षांचं हसू होतं..विरोधी पक्षांनी अधिक गांभीर्याने काम करायला हवं, ते पीडितांचा, शोषितांचा आवाज असतात..’ असं म्हणत त्यांनी भाजप पक्षाला टोला लगावला आहे.
ते पुढे म्हणाले,’राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका होणारच आहे. राज्यपालांना आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र ते गेला काही दिवसांपासून भाजप नेत्यांसाठी फ्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यपालांना असा खोचक सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. ‘