मुंबई – राज्यात थंडीचे वातावरण असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. आधीच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकरी अडचणीत आला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तयार झाला आहे. दक्षिण कोकण- गोवा ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.22 जानेवारी आणि 23 जानेवारी या दोन दिवसात पाऊस पडेल. उद्या आणि परवा गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात गारपीट पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात झालेल्या पावसामुळे फळांचा राजा आंबा संकटात आला आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यातही पाऊस पडल्याने याचा फटका द्राक्ष, कांद्याला फटका बसला होता. आता पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंतेत आहे.