मुंबई – राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतीपैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. भाजपाला 24 नगरपंचायती आणि 416 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 नगरपंचायती आणि 387 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला 18 नगरपंचायची आणि 297 जागा तसेच शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 300 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण 57 नगरपंचायती आणि 976 जागा तर भाजपाला 24 नगरपंचायती 416 जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक नेत्यांना प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवले. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.
तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनाही पराभवाचा धक्का बसला. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली असून शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. मात्र पराभव तर पराभवच आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली.”
ते पुढे म्हणाले, याचा पुरावा देखील सर्वानी पेपरमध्ये छापून आलेल्या फोटोवरून बघितला. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं खडसे यांनी सांगितलं आहे.