मुंबई – मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित या प्रकरणात लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्रात लिहिले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र देण्यासाठी तहसिलदार टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबर 2020 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षणासाठी अर्ज करण्याची मूभा देण्यात आली. त्या अंतर्गत आता मराठा समाजातील विद्यार्थी अर्ज करत असून त्यासाठी त्यांना आता ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत.
प्रशासनाकडून तसे प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केल आहेत, असे पत्रात नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी विनंती पत्रात केली आहे.