भोर – भोर तालुक्यातील ब्रिटिकालीन भाटघर धरण आज (दि. 12) दुपरी एकच्या सुमारास शंभर टक्के भरले असून, धरणाच्या 45 स्वयंचलित दरवाजांपैकी 30 दरवाजांतून 7 हजार 500 क्युसेक प्रती सेकंद वेगाने नीरा नदीत विसर्ग सुरू झाला असल्याची माहिती शाखा अभियंता नलावडे आणि नाना कांबळे यांनी दिली.
गेल्या आठ दिवसांपासून भोर तालुक्यात संततधार मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. नीरादेवघर ही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. भाटघर धरण मागील वर्षी 15 ऑगस्टला भरले होते, यंदा ते 3 दिवस आगोदरच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या उभारणीपासून आजपर्यंत केवळ दहा वेळा धरण 100 टक्के भरले नसल्याची नोंद धरण प्रकलपाकडे आहे.
भाटघर धरण ब्रिटिशकालिन धरण असून, त्याचे बॅकवॉटर 47 कि. मी. अंतरापर्यंत पसरलेले असून, धरणाची पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी आहे. सध्याचे भाटघर धरण भरल्यानंतर पाण्यात अदृश्य होणारे लेक व्हायटनिंग धरण हे ब्रिटिश स्थापत्य कलेचा उकृष्ट नमुना आहे. ऐतिहासीक वास्तू व कालवे नसलेले धरण असून, या धारणास स्वयंचलित 8 बाय 10 फुटाचे 45 दारवाजे आहेत आणि धरणास एकूण 81 मोऱ्या आहेत.
हे धरण 1913 साली बांधण्यास सुरुवात झाली आणि 1928 मध्ये पूर्ण करण्यात आले.या धरणाचे पोटात असलेले एस आकाराचे लेक व्हायटनिंग न तोडता ब्रिटिशांनी त्यातील 81 मोऱ्यांचा वापर जसाच्या तसा या नवीन भाटघर धरणाच्या बांधकामावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन धरणाच्या कामास अतिरीक्त खर्च करावा लागला नाही.
या धरणाचे संपूर्ण काम चिरेबंदी दगडातील असून कोर्स रबल स्वरूपाचे आहे. धरणाची उंची 190 फुट असून पाणी पातळी 143 फुट उंचीची आहे. या धरणाचे बांधकामास 1 कोटी 72 लक्ष रुपये खर्च त्या काळी आला. या धरणाच्या पाण्यावर 16 मेगावॅट म्हणजे 3 लाख युनिट वीज तयार होते. या धरणाचे पाणी वीर धरणात सोडण्यात येत असून, वीर धरणाच्या नीरा डावा कालव्यातून पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील जमिनीस आणि उजव्या कालव्यातून खंडाळा,फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो.