हिंगोली – यावर्षीही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर वरुन राजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्यापासून म्हणजे एक महिन्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका बसला आहे. अतिवृष्टीचा उत्पन्न वाढीवर परिणाम होणार आहे. आज दुपारी (रविवार दि. 31) हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस कराळे, चांगेफळ यासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.
अवघ्या 25 ते 30 मिनिटात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर काही ठिकाणी पिके सुद्धा पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. पाऊस केव्हा उघडतो याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. संततधार पावसामुळे पिकांची वाढ देखिल खुंटली आणि तूरीचे पिक तर पूर्णपणे जळून गेले आहेत. आत्ता सोयाबीन, कापूस, हळद पिके पाण्याखाली आहेत. नापीकीमुळे शेतकरी आत्ता हवालदिल झाला आहे. प्रशासनाच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना आर्थिक नुकसान भरपाई करावी, अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे.