हिंगोली – जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील धामणदरा भागातील मुसळधार पावसामुळे कृषी विभागाचे बांधलेला पाझर तलाव शुक्रवारी (दि.29) फुटला. या तलावाच्या पाण्यामुळे सुमारे 30 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. जमिनीही पूर्णपणे खरडून गेल्या आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव परिसरात पंधरा वर्षापुर्वी कृषी विभागाच्या मार्फत पाझर तलाव निर्माण केला होता. हा तलाव मागील दोन वर्षापुर्वी देखील फुटला होता; मात्र आजूबाजूसच्या शेतकऱ्यांनी हा तलाव दुरुस्त करून घेतला. मात्र जिल्ह्यात मागील 25 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रावारी अतिवृष्टीमुळे हा तलाव फुटला. तलावाचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, हळद यांसह आदी पिके वाहून गेली. त्याच बरोबर जमिनीही खरडुण गेल्या आहेत.
शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी
ओढा हा सरळ शेतातुन गेल्यामुळे शेत खरडले तसेच शेतकरी दत्तराव रवंदळे यांच्या शेतातील स्पींक्लरच्या 30 पाईप वाहुन गेली असून यातील 13 सापडल्या तर बाकी 17 पाईप चा शोध सुरू होता. 17000 रु नुकसान झाले आहे. तसेच या शेत शिवारातील ओढ्याचे पाणी शेतात जाऊन किसन सांगळे, बबनराव सांगळे, पद्माबाई भिमराव खिलारे, बंडू भिकाजी सांगळे, नथू सांगळे, निळकंठ सांगळे, पार्वती बाबाराव सांगळे, गोविंदराव खिलारे, विनायक सांगळे, सदाशिव सांगळे, दारकाबाई उत्तम सांगळे, बालाजी खिलारे, गणपत साहेबराव सांगळे, अनंता साहेबराव सांगळे, दादाराव रुस्तुम सांगळे, दत्तराव रवंदळे, गंगाराम नागरे आदी शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करुन योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.