सातारा – जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली असली तरी ऑगस्ट महिन्यातही माण तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. अद्यापही माण तालुक्यातील 41 गावे व 306 वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 54 गावे व 322 वाड्या अद्यापही टॅंकरवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात 23 विहिरी व 30 बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्यात साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता. सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टॅंकरची गरज निर्माण झाली होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस फक्त पश्चिम भागात झाल्याने अद्यापही अर्धा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. माण तालुक्यात 41 गावे व 306 वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सातारा, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, कराड तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये 54 गावे व 322 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 84 हजार 395 नागरिक आणि 45 हजार 595 पशुधनाची तहान या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्ह्यात 23 विहिरी व 30 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.
माण तालुक्यात 41 गावे 306 वाड्या, खटाव 1 गाव, फलटण 4 गावे, 16 वाड्या, कोरेगाव 6 गावे, वाई 2 गावे अशा 54 गावे 322 वस्त्यांवर टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने हजेरी लावल्याने गेल्या काही दिवसात जावळी, सातारा, महाबळेश्वर, पाटण, खंडाळा, कराड तालुक्यातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शासकीय 8 आणि 50 खासगी टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे गौरव चक्के यांनी सांगितले.