पुणे – ‘साथरोगांचा उद्रेक होण्याची भीती आहे. आरोग्य विभागाने सतर्क राहून त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करा,’ असे आदेश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिले आहेत. साथरोग नियंत्रणाबाबत सावंत यांनी ही बैठक घेतली. यावेळी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीची कारणे आणि उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी साथरोगांच्याबाबत जनजागृतीवर भर देवून नागरिकांना याबाबत शिक्षित करण्याच्या सूचना दिल्या. दूषित पाणी असल्याचे तपासणीत सिद्ध झाल्यास तेथे आवश्यक कारवाई करावी, असे सांगितले. तर, रक्त नमुन्यांचे संकलन वाढवावे. मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया रुग्णांची तपासणी वाढवावी, असे आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार म्हणाले. आरोग्य संचालक नितीन अंबाडेकर यांनी बैठकीत साथरोगांवरील उपाययोजनांची माहिती दिली.
…राज्यभर सर्वेक्षण
- घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थाने शोधणार
- डास नष्ट करून कीटकजन्य साथरोग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न.
- प्रत्येक कुटुंबात प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकता आवश्यक
- डबकी, स्वच्छ साठे यांची तपासणी केली जाणार
- कीटकनाशक औषधांची फवारणी, धूर फवारणीस प्राधान्य
पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे नागरिक आणि आरोग्य विभागाने सतर्क राहावे. – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री