maharashtra rain : यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. शेती पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर राज्यातील महत्वाच्या धरणांमधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अशात हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून, गुरुवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पण हा पाऊस सार्वत्रिक नाही तो काही भागातच बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वदूर जोरदार पावसाची आजही प्रतिक्षा आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
यासोबत उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
दरम्यान, ऑगस्ट महिना हा 1901 नंतरचा सर्वात कोरडा महिना ठरला आहे. काही भागात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात एकही दिवस पाऊस पडला नाही. परिणामी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, मुग, उडीद पीकांनी माना टाकल्या आहेत. काही ठिकाणी पीके करपून जात आहे. विरोधी पक्षांकडून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.