कराचीत 50 जणांचा मृत्यू
इस्लामाबाद – मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात मुसळधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्याचा सर्वांधिक तडाखा बसलेल्या कराचीत 3 दिवसांत 18 जण दगावले. त्यामुळे पाकिस्तानात जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने कराचीत आतापर्यंत 50 जणांचा बळी घेतला आहे.
पाकिस्तानचे आर्थिक केंद्र आणि सर्वांत मोठे शहर असणारे कराची पावसाच्या तडाख्याने बेहाल झाले आहे. सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे त्या शहरातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तसेच, आर्थिक व्यवहार बंद पडले. रस्त्यांलगतच्या अनेक घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
वीजपुरवठा खंडित झाल्याने कराचीमधील रहिवाशांच्या हालअपेष्टांमध्ये आणखीच भर पडली. त्या रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवताना स्थानिक प्रशासन आणि यंत्रणांच्या नाकीनऊ आले आहे. काही भागांत मोठी पडझडही झाली आहे.
प्रामुख्याने चालू महिन्यात कोसळलेल्या पावसाने कराचीचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्टमधील पावसाने 90 वर्षांचा विक्रम मोडल्याची माहिती पाकिस्तानी हवामान खात्याने दिली आहे.