भोपाळ – मध्यप्रदेश विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणूक नाही. मात्र, त्या पोटनिवडणुका मध्यप्रदेशचे भवितव्य ठरवतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी गुरूवारी केले.
मध्यप्रदेश विधानसभेच्या 27 जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्या पोटनिवडणुकांत बाजी मारल्यास भाजपचे सरकार आणखी भक्कम बनेल. मात्र, पोटनिवडणुकांत कॉंग्रेसला कौल मिळाल्यास सत्तेचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाथ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केलेल्या वक्तव्याला महत्व आहे.
मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागल्यानंतर कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. कॉंग्रेसचा लढा भाजपच्या कामगिरीशी नसून त्या पक्ष संघटनेशी आहे. मध्यप्रदेशातील जनतेसमोर कॉंग्रेसचा 15 महिन्यांचा कार्यकाळ आणि भाजपची 15 वर्षांची राजवट यांचे चित्र आहे, असेही त्यांनी म्हटले.
भाजपमध्ये डेरेदाखल झालेले तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे कॉंग्रेसला काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागली. ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशात पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत.