पंढरपूर – भीमा-निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा. वेळोवळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदीर या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केल्या.