मुंबई – बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. बालासोर येथील अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भारतात सर्वात अत्याधुनिक म्हणजे “कवच’ सुरक्षा प्रणाली. ही सुरक्षा प्रणाली संपूर्ण रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्यात येणार होती. मात्र अजूनही महाराष्ट्रातील एकाही रेल्वे मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
महाराष्ट्रात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या पाच झोनच्या रेल्वे धावतात. महाराष्ट्रात एकूण 5861 किमीचे रेल्वेचे जाळे आहे. मात्र अजूनही यापैकी एक किलोमीटरच्या रेल्वे लाइनवर देखील कवच प्रणाली बसवण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
संपूर्ण भारतात 68 हजार किमीपेक्षा जास्त मोठे रेल्वेचे जाळे आहे. यापैकी केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या 1455 किमी रेल्वे मार्गावर सध्या कवच ही प्रणाली बसवण्यात आली आहे. इतरत्र कुठेच ती कार्यान्वित नाही. तर दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा सेक्शनवरील 2951 किमीच्या रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसवण्यासाठी कंत्राट काढण्यात आले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच जास्त वाहतूक असलेल्या 35736 किमी रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसवण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रसह भारतात इतर काही सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आहेत. जसे की ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, जी सध्या 3600 किमी रेल्वे मार्गावर कार्यरत आहे, यासोबत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे जी सध्या 2572 स्टेशनवर कार्यान्वित झालेली आहे. तर मुंबईसारख्या शहरात ए डब्ल्यू एस नावाची सिस्टीम बसवण्यात आली आहे.
468.9 कोटींची तरतूद पडून
दक्षिण पूर्व रेल्वे झोनमधील कमी घनतेच्या रेल्वे नेटवर्कवर “कवच’ प्रणाली वापरण्यासाठी 468.9 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, मार्च 2022पर्यंत त्यापैकी एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही. त्याच झोनच्या दुसऱ्या सेक्टरमध्ये रेल्वे टक्कर टाळण्याच्या प्रणालीसह लॉंग टर्म ईव्हॉल्युशन सिस्टीमबाबत कमी घनतेच्या रेल्वे नेटवर्कवरसुमारे 312 कोटी रुपयांचा भांडवली खर्च मंजूर करण्यात आला आहे. तथापि, मार्च 2022पर्यंत यापैकी कोणतीही रक्कम खर्च केलेली नव्हती. 2022-23साठी देखील त्यातील रुपयाही खर्चासाठी घेतलेला नाही, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली.