पुणे, दि.1 – काही दिवसांवर दिवाळी आल्यामुळे नागरिकांकडून सुट्टीचे नियोजन करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पुणे स्टेशन येथून सुटणाऱ्या 95 टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे गावी कसे जायचे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रेल्वे बोर्डाकडे पुणे जिल्ह्यातून राज्याच्या विविध भागात दिवाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त शहर आणि परिसरात आले आहेत. तसेच पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून देखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत असतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना 15 ते 20 दिवस सुट्टी असते त्यामुळे बहुतांशी पालक दिवाळी निमित्त गावी जातात किंवा फिरायला जायचे नियोजन करतात. त्यामुळे पुणे येथून सुट्टीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
पुणे येथून दररोज 270 ट्रेन ये-जा करतात यातील तीन ट्रेन पुणे स्थानकातून दररोज सुटतात. तर 13 ट्रेन या आठवड्यातील ठारावीक दिवसांनी सुटतात. सध्या, या सर्व ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी आणि गावी जाणाऱ्या नागरिकांसमोर नियोजन करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपुजा आणि उन्हाळी सुट्टी विशेष ट्रेन चालविल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते तसेच आयटी हब म्हणून देखील पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवड परिसरात हजारो आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये परराज्यातून आणि राज्याच्या विविध भागातून लाखो तरूण-तरूणी कामाला आहेत, त्यांचीही गैरसोय होणार आहे.