मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरला असल्याची आहे. या प्रकरणी बुधवार 10 जानेवारी रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समजते. यावरूनच आता राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल नार्वेकरांनी याबाबत एक सल्ला दिला आहे.
“राहुल नार्वेकरने सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी निर्णय नाही देत. काय करायचं ते करा” असा सल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्या बाबत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला.
राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाहीत. सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहत आहे. यामुळे स्पीकर म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे निर्णय देणार नाही. मला जेव्हा निर्णय द्यायचा तेव्हा देईल असा थेट सल्ला आंबेडकरांनी यावेळी दिला.
सोमनाथ चॅटर्जी यांचा दिला दाखला
सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली होती. तेव्हा चॅटर्जी यांनी उलटा जवाब दिला होता, नोटीस पाठवणाऱ्यांना मी समन्स करतो. मला नोटीस बजावणारा लोकसभेत येत कसा नाही ते मी बघतो, असा इशाराच चॅटर्जी यांनी दिला असल्याचे आंबेडकरांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष विरुद्ध कोर्टाचं भांडण मिटलं. तेव्हा कोर्टाने चूक मान्य केली होती. स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही, असं कोर्टाने कबूल केलं होतं अशी आठवण प्रकाश आंबेडकरांनी यावेळी करून दिली.
इथं नार्वेकर आणि चॅटर्जी यांना समान अधिकार आहेत आणि राहुल नार्वेकर यांना सोमनाथ चॅटर्जी व्हायची संधी मिळाली आहे. होऊन जा.. असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर नार्वेकरांना उद्देशून म्हणाले.
राजकीय वर्तुळात चर्चा
पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.