नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आज गुरुवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. विजय चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी राज्यसभेमध्ये उडालेल्या गदारोळाबाबत भाष्य केले.
गांधी यांनी, राज्यसभेमध्ये बाहेरून लोकांना बोलावून खासदारांवर हल्ला करण्यात आला त्यांना मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप केला. देशाच्या इतिहासामध्ये राज्यसभेत मारहाण झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
विजय चौक येथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ‘आम्ही संसदेमध्ये पेगॅसस प्रकरण, शेतकरी कायदे यांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला तिथं बोलू दिल नाही. त्यामुळेच आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथं यावं लागलं. ही लोकशाहीची हत्या आहे.’ असं राहुल गांधी म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे देखील सहभागी झाले होते. राऊत यांनी यावेळी, बाहेरून आलेल्या लोकांना मार्शलचे कपडे घालण्यात आले. व त्यांनी महिला खासदारांना मारहाण केली असा आरोप लगावला.