कोची, दि. 22 – इंधन दरवाढीतून मोदी सरकार जनतेची लूट करीत आहे हे सरकार सामान्य माणसांच्या खिशातून पैसे काढून आपल्या मित्रांचीच धन करीत आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारच्या गेैरव्यवस्थापनामुळेच संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. केरळात निवडणूक प्रचार दौऱ्यावर आलेले राहुल गांधी हे आज सेंट तेरेसा कॉलेजातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.
ते म्हणाले की मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेत घातलेला घोळ बराच गंभीर असल्याने त्यांचे दीर्घ कालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आज देशातील जनतेपुढे मोठे आर्थिक संकट असून गरीबांच्या व अन्य सर्वसाधारण लोकांच्या हातात जादाचे पैसे देणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. पण मोदी सरकारने ही मागणी मान्य न करता उलट लोकांकडूनच अधिक लूट चालवली आहे.
लोकांच्या हातात पैसे आले तर ते तो पैसा खर्च करतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे हे साधे गणित आहे.मोदी सरकारने नोटबंदी व चुकीची जीएसटी यातून देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे संकट निर्माण केले. पुढे करोनामुळे उरली सुरली अर्थव्यवस्थाही साफ कोसळली आहे. ते म्हणाले की सरकारकडे आज कारभार चालवण्यासाठी पैसे नाहीत.
करांच्या रूपातूनही पैसा जमा होताना दिसत नाही म्हणूनच त्यांनी आता इंधनाची दरवाढ करून लोकांच्या खिशातून जबरदस्तीने पेैसे वसूल करण्याचे काम सुरू केले आहे. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालवायची असेल तर त्यासाठी समाजात सलोखा असणे महत्वाचे असते पण मोदी सरकारने सलोखा,शांतता आणि स्थैर्यच धोक्यात घालून आणखी मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे असे ते म्हणाले.