नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर सावरकर बनण्यासाठी दृढ निश्चय आणि देशाप्रती प्रेम आवश्यक असते. शिवाय सावरकरांइतका निस्वार्थीपणा आणि वचनबद्धता आवश्यक असते. मी राहूल गांधींना सांगू इच्छितो की, स्वप्नातही त्यांनी स्वत:ची तुलना महान आणि तेजस्वी अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांशी करु नये, अशा शब्दांत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि निलंबित खासदार राहूल गांधी यांना चपराक लगावली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे घटक असूनही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे ” आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही,’ अशा तिखट शब्दांत राहूल गांधींवर टीका केल्यानंतर, आता ठाकूर यांच्या विधानानेही राहूल गांधींचे सावरकरांविषयीचे वक्तव्य पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे.
“कैसे सब चोरों का सरनेम मोदी हैं’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुरत न्यायालयाने गांधी यांना ठोठावल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांचे वायनाड संसद सदस्यत्त्व रद्द केले होते. “राहूल यांना सुरत न्यायालयात माफी मागून विषय संपवण्याची संधी न्यायाधिशांनी दिली असता, आपण शिक्षा भोगु, पण माफी मागणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. नंतर पत्रकारांशी बोलताना याबाबत राहूल गांधी म्हणाले होते की, “गांधी कभी माफी नही मांगते; और माफी मांगने के लिये मै सावरकर नही हूं…’ त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे.
राहुल गांधी हे कधीही सावरकर होऊ शकत नाहीत, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुट्टी आणि ऐषोरामासाठी वर्षातील सहा महिने कधीही परदेश प्रवास केला नव्हता किंवा आपल्या देशाविरुद्ध कारवाया करण्यासाठी परदेशी शत्रुंची कधीही मदत घेतली नव्हती. भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्यासाठी सावरकर ब्रिटनला गेले होते. त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची तुलना राहूल गांधींच्या वागण्याशी कधीच होऊ शकत नाही, असेही ठाकूर म्हणाले. वीर सावरकर यांच्या विरोधात न थांबता मूर्खपणासाठी खोटे बोलणाऱ्या राहुल गांधी यांना रोखण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबण्याची आता खरोखरच वेळ आली आहे.
इंदिरा गांधी आणि सावरकर…
वर्ष 1923 च्या काकीनाडा अधिवेशनात कॉंग्रेसने सावरकरांना पाठिंबा देणारे ठराव पारित केले होते. सावरकरांच्या जन्मशताब्दीवेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लिहिलेले पत्रही ठाकूर यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. इंदिराजी म्हणतात की, वीर सावरकरांच्या ब्रिटीश सरकारविरोधी कार्याला आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात स्वतःचे महत्त्वाचे स्थान आहे. केंद्र सरकारने इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सावरकरांवर एक माहितीपटही प्रसिद्ध केला होता. तसेच इंदिरा गांधींनी त्यांचे टपाल तिकीट देखील जारी केले होते.