नवी दिली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पॅरिसमध्ये बोलताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी, ‘‘सत्ताधारी भाजपला कसेही करून सत्ता मिळवायची आहे. या पक्षाच्या आचरणाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही,’’ अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींच्या या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केले. यात त्यांनी “मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. मोदीजींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदीजींची कल्पनाशक्ती सुरू होते, यातच काय ते आले”, असे म्हटले आहे.
त्यासोबतच पुढे बोलताना, “राहुल गांधीनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल म्हणे माहिती दिली. ‘भारत’ शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन ‘भारत जोडो’ म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? ‘इंडिया जोडो’ म्हणा ना!”, अशीही टीका देखील उपाध्ये यांनी केली आहे.
फ्रान्सची पॅरिसस्थित अग्रगण्य समाजविज्ञान संस्था ‘सायन्सेस पीओ विद्यापीठा’त विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी,”मी गीता वाचली आहे. मी उपनिषदेही वाचली आहेत. त्यासह अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचेही मी वाचन केले आहे. त्यातून माझ्या असे निदर्शनास आले, की भाजपचे आचरण हिंदू धर्माप्रमाणे अजिबात नाही. एखाद्या कमजोर व्यक्तीला भीतीच्या सावटाखाली ठेवावे, त्याला इजा पोहोचवावी, त्याचे नुकसान करावे, असे मी एकाही हिंदू धर्मग्रंथांत वाचले नाही अथवा कुणा हिंदू विद्वानाकडून ऐकलेही नाही. हिंदू राष्ट्रवाद हा विचार आणि शब्द चुकीचा आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणे-घेणे नाही. कुठलेही मोल चुकवून त्यांना सत्ता मिळवायची-टिकवायची आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना काही मोजक्या व्यक्तींच्या हातात सत्ता हवी आहे. त्यांच्यात हिंदू धार्मिकता वगैरे काही नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
त्यासोबतच भारत-इंडिया या देशाच्या नावावरून सुरू झालेल्या वादावर राहुल म्हणाले, की, राज्यघटनेत देशाची व्याख्या ‘इंडिया म्हणजेच भारत, संघराज्य’ अशी करण्यात आली आहे. सर्व राज्ये इंडिया किंवा भारत निर्माण करण्यासाठी एकत्र आली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा आवाज व्यवस्थित ऐकला जातो. कोणताही आवाज दाबला जात नाही किंवा धमकी देऊन बंद केला जात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.