Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अर्धवट सोडून राहुल गांधी अचानक वायनाडला रवाना झाले आहेत. शनिवारी राहुल गांधी यांचा यात्रेचा मार्ग वाराणसी ते उत्तर प्रदेशातील भदोही असा होता. पण राहुल गांधी अचानक वायनाडला गेले आहेत. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास त्यांनी अर्ध्यावरच थांबवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी वायनाडला जाणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र आता यामागचे कारण देखील समोर आले आहे.
राहुल गांधी संसदीय मतदार संघाला भेट देणार असल्याचे म्हंटले जात आहे. वायनाड येथे शुक्रवारी सकाळी जंगली हत्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याचा कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर राहुल गांधींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मृत व्यक्ती वनविभागाची इको-टूरिझम गाइड होती. कुरुवा बेट या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असे वन अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जयराम रमेश ट्वीट
राहुल गांधी यांच्या वायनाड भेटीची माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत लिहिले की, वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीची नितांत गरज आहे. ते आज सायंकाळी 5 वाजता वाराणसीहून रवाना होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रा रविवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता प्रयागराजमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली होती. काँग्रेसचा हा प्रवास 15 राज्यांतून 6,700 किलोमीटरचे अंतर प्रवास मुंबईत संपणार आहे.