Rahul Gandhi On Pm Narendra Modi Bhandara Sabha – पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून 24 तास धर्माचे राजकारण सुरु असते, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत.
नुकतेच चंद्रपूर आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे देखील मैदानात उतरले आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची आज सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ( Lok Sabha Election 2024 )
भंडारा-गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासह पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली या पाचही लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा झाली.
राहुल गांधी म्हणाले, “आम्ही अदानींचे नव्हे शेतकरी, गरीब, बेरोजगारांचे सरकार चालवणार आहे. अग्निवीर ही लष्करातील नव्हे मोदींच्या डोक्यातील योजना आहे, आमचे सरकार आल्यावर आम्ही अग्निवीर योजना बंद करणार, आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण करतो तर मोदी धर्मावर 24 तास बोलतात’, असेही राहुल गांधी म्हणाले.
तसेच केंद्र सरकारने सुरु केलेली अग्नीवीर योजना रद्द करण्यासह अनेक घोषणा राहुल गांधींनी केल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले की, आमचे सरकार आले की पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार आहे, अशी मोठी घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ही योजना आर्मीने नाही. तर पंतप्रधान कार्यालयात बनली आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
याशिवाय गरीबी रेषेच्या खालील महिलांच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये देणार आहोत. चुकीची जीएसटी लागू केलीय. याला आम्ही बदलणार. त्यामुळे एक टॅक्सच असेल कमीत कमी असेल. युवकांसाठी अप्रेंटिपीस योजना आणणार, पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, खासगी कंपन्यांकडून परीक्षा बंद करणार, पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, अशा घोषणा यावेळी राहुल गांधी यांनी केल्या आहेत.