भंडारा – काँग्रेस पक्षाने जो वचननामा तयार केला तो अतिशय विचारपूर्वक आणि जनतेचे मत लक्षात घेऊन तयार केला असून सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी दिले. तसेच देशातील जनतेला असे भासवले जाते की हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, पण खरतर हे एका उद्योगपतीचे सरकार आहे. मोदी सरकारने जितकं या मोजक्या उद्योगपतींना दिले आहे. त्यापेक्षा कतीतरी पटीने काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देशातील सामान्य जनतेला देेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. (Bhandara Gondia Lok Sabha Election 2024)
भंडाऱ्यातील साकोली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा चौफेर समाचार घेतला. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींनी आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत गरीब वर्गासाठी काय केले हे देशाला सांगायला हवे. केंद्र सरकार काही उद्योगपतींसाठी काम करत आहे. देशाच्या 50 टक्के लोकसंख्येएवढी संपत्ती फक्त 22 व्यक्तींकडे आहे. पण मोदी फक्त धर्माबद्दल बोलतात आणि जाती आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मागील दहा वर्षांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेल्या श्रीमंतांसाठी सरकार चालवले.
मी कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत चाललो. जवळपास 4000 हजार किलोमीटर चाललो. त्यावेळी रस्त्यात माझी हजारो ते लाखो लोकांशी चर्चा झाली. त्यावेळी मी प्रत्येकाला विचारले तुमची अडचण काय आहे, त्यावेळी प्रत्येकाने बेरोजगारी, महागाई ही आमची अडचण असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. गरीबांची तर या देशात भागिदारीच नाही. पण 24 तास टीव्ही पाहिला तर कधीच बेरोजगारी, महागाई यावर कधीच चर्चा झालेली नाही. शेतकरी, मजदूर कधीच दिसणार नाही, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातल्या तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज अशी स्थिती आहे की लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमाला हमीभाव दिला नाही. देशातील शेतकरी अडचणीत असताना कर्जमाफी होत नाही. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देणार असल्याचे त्यांनी म्हले आहे.