नवी दिल्ली – देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची धांदल सुरू झाली असताना निवडणूक रणनीतीज्ञ प्रशांत किशोर अर्थात पी. के. यांनी एका माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली व त्याचवेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत भाष्य करताना राहुल यांना सल्ले कोण देतो याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पीके म्हणाले आताच्या निवडणुकीच्या काळात जेथे राजकारण होते तेथे त्यांनी केंद्रस्थानी असले पाहिजे अशा वेळी राहुल गांधी यांनी यात्रा सुरू केली आहे. ते आता पूर्वोत्तर यात्रा करण्यात व्यस्त आहेत. विभागांचा दौरा करणे ठीक आहे मात्र यावेळी मुख्यालय सोडणे हे निश्चितपणाने बुध्दीमत्तेचे लक्षण नाही. त्यांना कोणी हा सल्ला दिली याची आपल्याला माहिती नाही. तसेच त्यांनी मणिपूर येथून यात्रा का सुरू केली हेही आपल्याला समजले नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कोलांटउडीबद्दल ते म्हणाले की, याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे. तसेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला झटका बसावा आणि ही आघाडी तोडता यावी यासाठीच नितीश कुमार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.