सोलापुर – हितेश वळुंज व तरणजीत सिंग धिल्लन यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर सौराष्ट्रचा पहिला डाव २०२ धावांवर संपला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राचीही पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ७ बाद ११६ अशी घसरगुंडी उडाली. धर्मेंद्रसिंह जडेजाच्या अफलातून गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या दीग्गज फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील या लढतीत पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राचे अझीम काझी ४ तर तरणजीतसिंग धिल्लन २ धावांवर खेळत होते.
Stumps Day 1: Maharashtra – 116/7 in 28.6 overs (T R Dhillon 2 off 9, A N Kazi 4 off 9) #MAHvSAU #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 2, 2024
त्यापूर्वी, सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. धर्मेंद्रसिंह जडेजाने ७२ तर प्रेरक मंकडने ५६ धावांची खेळी केल्याने त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली. महाराष्ट्राकडून हितेश वळुंजने ९३ धावांत ६ तर तरणजीत सिंग धिल्लनने ५४ धावांत ४ गडी बाद केले.
महाराष्ट्राचा डाव सुरु झाल्यावर सौराष्ट्रच्या गोलंदाजीसमोर कर्णधार केदार जाधवसह नावाजलेले फलंदाज अनावश्यक फटके खेळून बाद झाले. महाराष्ट्राच्या कौशल तांबेने ३७ तर, अंकित बावणेने ३४ धावा केल्या व संघाला शतकी मजल मारुन दिली. सौराष्ट्रच्या धर्मेंद्रसिंह जडेजाने ४७ धावांत ४ गडी बाद केले. युवराजसिंग दोदीयाने २३ धावांत २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र पहिला डाव – ६०.१ षटकांत सर्वबाद २०२ धावा. (धर्मेंद्रसिंह जडेजा ७२, प्रेरक मंकड ५६, हितेश वळुंज ६-९३, तरणजीत सिंग धिल्लन ४-५४). महाराष्ट्र पहिला डाव – २९ षटकांत ७ बाद ११६ धावा. (कौशल तांबे ३७, अंकित बावणे ३४, धर्मेंद्रसिंह जडेजा ४-४७, युवराजसिंग दोदीया २-२३).
पुजाराचा फ्लॉप शो
सौराष्ट्राचा स्टार फलंदाज व भारताचा तंत्रशुद्ध कसोटीपटू फलंदाज चेतेश्वर पुजारा याने पुन्हा एकदा साफ निराशा केली. त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी बेजबादाररीत्या आपल्या विकेट फेकल्या तर पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो केवळ ३ धावा करुन हितेश वळुंजच्या गोलंदाजीवर बाद झाला. सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून त्यात पहिल्या दोन कसोटीनंतर उर्वरीत तीन कसोटींसाठी संघ निवड होणार आहे. त्यात आपली वर्णि लागेल अशी पुजाराची अपेक्षा होती मात्र, त्याचा फ्लॉप शो कायम असल्याने त्याचे भारताच्या कसोटी संघातील पुनरागमन आता अशक्य दिसत आहे.