नवी दिल्ली: काश्मीरशी संबंधित घडामोडींवरून मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य करणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपने खिल्ली उडवली आहे. जागे असतानाही काही जण झोपेचे सोंग करतात. तसे लोक त्यांच्या पक्षातच एकाकी पडले आहेत, असा शाब्दिक टोला भाजपकडून लगावण्यात आला.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी कलम 370 हटवण्याचे पाऊल उचलले. त्या निर्णयानंतर काश्मीरमधील स्थिती बिघडल्याचा आरोप करत राहुल सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत. त्याबाबतचा प्रश्न सोमवारी पत्रकारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांना विचारला. त्यावरून राहुल यांच्यावर पलटवार करताना प्रधान यांनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याकडे लक्ष वेधले. सरकारच्या पाऊलामुळे संपूर्ण देश जल्लोष करत आहे. अडचणी उत्पन्न करणारे काही जण आहेत. त्यांचा नेता बनण्याची राहुल यांची इच्छा असेल; तर भाजप त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती दाखवू शकतो, अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली.