मोदी सरकारच्या निर्णयाचे महत्व विषद करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रम राबवणार
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. आता त्या निर्णयाचे महत्व विषद करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुढील महिनाभर देशव्यापी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्या कार्यक्रमांतर्गत कलम 370 वरून जनतेपर्यंत पोहचण्याचा भाजपचा मनोदय आहे.
संबंधित कार्यक्रमांतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशातील 35 मोठ्या आणि 370 लहान शहरांमध्ये भाजपच्या जाहीर सभा होतील. जम्मू-काश्मीरमधील 9 ठिकाणांचाही त्यामध्ये समावेश आहे. भाजपच्या देशव्यापी कार्यक्रमात पक्षाचे मंत्री, खासदार आणि पदाधिकारी सभांमधून मोदी सरकारच्या निर्णयाचे महत्व जनतेपुढे मांडतील. त्या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांमधील मान्यवरांच्या भेटीही घेतल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय केवळ भावनिक स्वरूपाचा नाही. ठोस कारण त्यामागे आहे. तो निर्णय ऐतिहासिक आहे. राजकीय आणि विचारसरणीतील भेद विसरून जनतेला एकवटायला लावणारा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मोजक्या क्षणांपैकी तो एक आहे, असे भाजपने म्हटले आहे.