बोदारली – राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आपला महाराष्ट्रातील प्रवास संपवून आता मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. आज सकाळी ही यात्रा मध्यप्रदेशच्या हद्दीत आली त्यावेळी यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेतील तिरंगा ध्वज मध्यप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे सुपुर्त केला. ही यात्रा मध्यप्रदेशात 12 दिवस चालणार आहे. मध्यप्रदेशातील यात्रेचे अंतर 380 किमी इतके असून त्यानंतर ही यात्रा राजस्थानात प्रवेश करेल.
बोदारली हे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील छोटे गाव आहे. गावची लोकसंख्या जेमतेम सहा हजार इतकी आहे. हा केळी उत्पादन करणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यात्रेच्या स्वागतानिमीत्त या भागातील नागरीकांनी आपल्या दारावर केळीची पाने व खुंठ लाऊन पारंपारीक पद्धतीने आपली घरे सजवली होती.
स्थानिक रहिवाशांनी पारंपारीक नृत्य करून राहुल गांधी यांच्या यात्रेचे स्वागत केले. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ही यात्रा काढण्याचा उद्देश नमूद केला. ते म्हणाले की समाजातील भेदभाव, हिंसा, आणि द्वेषाचे वातावरण नाहीसे करून एकोपा निर्माण करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा श्रीनगर मध्ये तिरंगा फडकाऊनच थांबेल तो पर्यंत ही यात्रा कोणीही अडवू शकत नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.