गुवाहाटी – गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देताना सोनिया गांधी यांना जे पत्र पाठवले आहे त्या पत्रात आणि 2015 मध्ये जेंव्हा मी कॉंग्रेसचा राजीनामा देताना लिहीले होते त्या पत्रात बरीच समानता आहे असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व सरमा यांनी केला आहे.
एका कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सरमा म्हणाले की कॉंग्रेसची समस्या ही आहे की त्या पक्षातील सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधी लहरी, अपरिपक्व आणि मनमौजी आहेत. मात्र तरीही त्यांच्या मातोश्री त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा पक्षाचा विचार करत नाहीहेत. प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून त्या केवळ आपल्या मुलाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा उद्देश कधीच सफल होणार नाही.
पक्षातील सगळे निष्ठावान नेते एका पाठोपाठ एक पक्षातून बाहेर पडत आहेत. 2015 मध्ये मी जेव्हा राजीनामा पत्र पाठवले होते, तेव्हा त्यात लिहीले होते की एक वेळ अशी येईल की कॉंग्रेस पक्षात केवळ गांधी कुटुंबच राहील.
बाकीचे सगळे पक्ष सोडून जातील. आज तेच होताना दिसते आहे. माझे ते राजीनामा पत्र आणि आझाद यांचे कालचे पत्र यात बरीच समानता आहे. जे मुद्दे तेव्हा होते, तेच आजही आहेत व यापुढेही राहतील अन त्यामुळे पक्षात कोणीच राहणार नाहीत. राहुल गांधी हे भारतीय जनता पार्टीसाठी वरदान आहेत. (Rahul Gandhi boon for BJP – CM Himanta Biswa Sarma)