मुंबई – भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदावर द्रविडची नियुक्ती होणार आणि सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची गच्छंती होणार या चर्चेला पूर्णविराम बसला आहे.
अचानकपणे बीसीसीआयमध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल होताना दिसत आहे. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्री यांची मुदत संपत असून त्यांनीच करार वाढवण्यासाठी अनुकुलता दाखवलेली नसल्याने नव्या व्यक्तीची नियुक्ती होणार आहे. पण आता या शर्यतीत द्रविडचा समावेश नसणार हे स्पष्ट झाल्यामुळे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
एनसीच्या प्रमुखपदाचा द्रविड यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने अर्ज मागवण्यात आले होते. नवीन घटनेनुसार करारात मुदतवाढीची तरतूद नाही आणि निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू केली जाते.
द्रविडने पुन्हा अर्ज केला आहे. त्याच्या व्यतरिक्त अन्य कोणाचाही अर्ज दाखल झालेला नसल्याने त्यांचीच नियुक्ती होणार हे देखील जवळपास निश्चित मानले जात आहे.