नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपण प्रचंड थकलो असून आता तरी मला घरी काही दिवस शांतपणे राहू द्या. मायदेशात आल्यापासून मी घरी गेलेलो नव्हतो. सातत्याने संस्था, संघटना तसेच विविध राज्यांच्या सरकारकडून आयोजित होत असलेल्या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहात असताना मला शांत झोपही मिळालेली नाही, त्यामुळे पुढील काही दिवस मला समजून घ्या, असे आर्त आवाहन केले आहे.
नीरजला 13 ऑगस्टला हरियाणा सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला अंगात ताप असल्यामुळे उपस्थित राहता आले नव्हते. नीरजचे कुटुंबीय आणि त्याच्या खंडारा गावातील नागरिकांनी नीरजचा सत्कार आयोजित केला होता.
या सोहळ्याला उपस्थित राहिला असताना त्याला कार्यक्रमातच त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टोकियोवरून मायदेशी परतल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार सोहळे, प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींना तसेच सरकारी स्तरावर होत असलेल्या सोहळ्यांना उपस्थित राहावे लागले. त्यामुळे त्याला स्वतःच्याच घरीही जाता आलेले नाही. त्यामुळेच त्याने हे भावनिक आवाहन केले आहे.
नीरजने 7 ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर 9 ऑगस्टला तो मायदेशात दाखल झाला. तेव्हापासून दहा दिवस तो कुटुंबीयांपासून दूर होता.
दरम्यान, नीरजला त्याचे कुटुंबीय आणि पानिपतचे उपायुक्त सुशील सरवान यांनी त्याच्या घरी नेले.
नीरजसाठी आयोजित होत असलेले सत्कार सोहळे सुरूच आहेत. यामुळे त्याला पुरेशी झोपही मिळालेली नाही. आता माझ्या क्षमतेची कसोटी लागत आहे. मला आता आरामाची जास्त गरज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मला समजून घ्या व घरीच राहू द्या, असे आवाहनही त्याने केले आहे.