लखनौ -भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज व आयपीएल स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार लोकेश राहुल याच्या कारकिर्दीबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताच्या कसोटी संघापाठोपाठ आता त्याची आयपीएल स्पर्धेतील कारकीर्दही मध्यावरच थांबवली जाऊ शकते, असा धोका निर्माण झाला आहे.
राहुलच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झालेली नाही. तसेच कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 व यंदाची आयपीएल स्पर्धा यात त्याला सातत्याने अपयश येत आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरुद्धच्या लढतीतही त्याच्या संथ फलंदाजीवर प्रचंड टीका सुरू आहे. त्यामुळे जर येत्या काही सामन्यांत त्याच्याकडून सरस कामगिरी झाली नाही तर त्याचे लखनौचे कर्णधारपदही जाऊ शकते इतकेच नव्हे तर त्याचे संघातील स्थानही जाऊ शकते, असेच संकेत सध्या मिळत आहेत.
राहुलने यंदाच्या मोसमात आतापर्यंत केवळ 8, 20, 35 आणि 18 धावा केल्या आहेत. कसोटीत तो सातत्याने अपयशी ठरत असल्याने आधी त्याचे उपकर्णधारपद काढून घेतले गेले. त्यानंतर त्याला संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता आयपीएल स्पर्धेतील चार सामने पार पडलेले असतानाही त्याच्या बॅटमधून मोठी खेळी घडताना दिसत नसल्याने आता त्याचे या स्पर्धेतील स्थानही जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जर राहुलकडून सरस कामगिरी झाली नाही तर या स्पर्धेच्या मध्यावरच त्याला कर्णधारपदावरून दूर केले जाऊ शकते. राहुलचा निराशाजनक फॉर्म इतका अपयशी ठरला की बीसीसीआयने केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या गटवारीत राहुलला अ श्रेणीतून बाहेर काढत ब श्रेणीत टाकले. त्यामुळे कामगिरी सुधारली नाही तर त्याला आणखी आपमानास्पद गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.