जगात मंदीचे ढग पसरत असताना दिवाळीच्या मुहुर्तावर पीकपाण्याची सुवार्ता कानी येणे, ही दिलासा देणारीच बाब आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खास करून मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापूर्वी विदर्भातही लक्षणीय हानी झाली होती. मात्र सर्वच वातावरण काही प्रतिकूल नाही. देशात रब्बी हंगामातील पेरणी सुरू झाली असून, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात सर्वाधिक पेरा झाला आहे. मोहरी व हरभऱ्याच्या लागवडीचा जोर असून, गव्हाची पेरणी लवकरच सुरू होईल. परतीच्या पावसामुळे देशातील खरिपाच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. परंतु रब्बी पेरणीसाठी भरपूर पाणी उपलब्ध झाले असून, देशात आतापर्यंत 25 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्रात 46 टक्क्यांची वाढ झाली आहे.
एकूण लागवडीत सर्वाधिक प्रमाण मोहरीचे असून, 15 लाख हेक्टरवर ही लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 40 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तर हरभऱ्याच्या लागवडीतही दुपटीने भर पडली आहे. देशातील एकूण लागवडीपैकी राजस्थानात जवळपास 12 लाख हेक्टरवर मोहरीचा पेरा झाला आहे. मागील हंगामात केवळ साडेसात लाख हेक्टर क्षेत्र मोहरीखाली होते. उत्तर प्रदेशातही मोहरीची पेरणी झालेले क्षेत्र गतवर्षी 2 लाख 80 हजार हेक्टर होते, तर यंदा ते चार लाख हेक्टर इतके आहे. केंद्र सरकारने यंदा मोहरीसाठी प्रतिक्विंटल 5,450 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु राजस्थान व उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना यापेक्षाही जास्त भाव मिळाला आहे.
पिकांना दोन गोष्टी लागतात. एक पाणी आणि दुसरी पोषणद्रव्ये. तसेच जेव्हा चांगले भाव मिळतात, तेव्हा शेतकरी उत्साहाने जादा लागवड करतो. सप्टेंबरमध्ये जादा पाऊस पडल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठे वाढले आहेत. जून ते ऑगस्ट या काळात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांत पावसाने दगा दिला होता. परंतु नंतर पडलेल्या पावसामुळे तेथील धरणांमध्ये व तलावक्षेत्रात पाण्याच्या पातळीत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस तेथे पडला. आता पाण्याची टंचाई नसल्यामुळे रब्बीची पिके भरघोस येतील, अशी अपेक्षा आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने गव्हाच्या किमान आधारभावात (एमएसपी) 2015 वरून 2125 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल वाढ केली. तर मोहरीचे भाव क्लिंटलला जे 5050 रुपये इतके होते, ते 5,450 रुपयांपर्यंत नेऊन ठेवले. याचा अर्थ गव्हाच्या भावात क्विंटलला 110 रुपये वाढ झाली. मागच्या दोन वर्षांत ते 40 आणि 50 रुपयांनीच वाढले होते. मोहरीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही लाभ झाला आहे. विशेष म्हणजे, नवीन एमएसपीपेक्षा खुल्या बाजारातील भाव आणखीनच जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहात दुप्पट वाढ झाली आहे.
2021-22च्या डिसेंबर-जानेवारीत युरियाची 900 ते 1000 डॉलर प्रतिटन या भावाने आयात केली जात होती. युरियामध्ये 46 टक्के नत्राचे प्रमाण असते. गेल्या जुलैत डायअमोनियम फॉस्फेटच्या (डीएपी) आयात भावांचे प्रमाण टनाला 950 ते 960 डॉलर्स इतके होते. डीएपीमध्ये 18 टक्के नत्र आणि 46 टक्के फॉस्फरस असते.
जुलै-सप्टेंबर 2022 या दरम्यान फॉस्फरिक ऍसिडचे भाव प्रतिटन 1715 डॉलर्स इतके होते, तर सल्फरचे पाचशे ते सव्वापाचशे डॉलर्स आणि अमोनियाचे 1600 डॉलर्स इतके होते. परंतु त्यानंतरच्या काळात सुदैवाने हे भाव घसरले आहेत. युरियाचे प्रतिटन 650 ते 655 डॉलर्स, डीएपी 720 ते 740 डॉलर्स, फॉस्फरिक ऍसिड 1175 डॉलर्स, अमोनिया 850 ते 900 डॉलर्स आणि सल्फर 30 ते 135 डॉलर्स इतके भाव आहेत. तसेच फक्त म्युरेट ऑफ पोटॅशचे (एमओपी) भाव गेल्यावेळेपेक्षा दुपटीने वाढले आहेत. सध्या ते प्रतिटन 590 डॉलर्स इतके आहेत.
भारत बेलारूस आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात एमओपीची आयात करतो. युक्रेनच्या युद्धामुळे उपरोल्लेखित दोन देशांमधून होणाऱ्या आयातीवर परिणाम झाला आहे. कॅनडा, इस्रायल व जॉर्डनमधून होणारा एमओपीचा पुरवठा त्या प्रमाणात वाढला नाही. अर्थात एक एमओपीचा अपवाद केला, तर युरिया, डीएपी वगैरेंच्या खतपुरवठ्यात कसलीही टंचाई नाही. त्यामुळे हवामान, पाण्याची उपलब्धता आणि खते या दृष्टिकोनातून परिस्थिती अनुकूल आहे. गहू, मोहरी, चणा, मसूर, मटार, बटाटे, कांदा, बार्ली, मका, लसूण, जिरे, धणे आणि बडीशेप ही रब्बी पिके चांगल्या प्रमाणात येतील, अशी आशा आहे.
तसेच पश्चिम बंगाल, आसाम, तेलंगण, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये तांदूळ हे रब्बीचे प्रमुख पीक आहे. तेही दणदणीत प्रमाणात येईल, असा अंदाज आहे. खरिपात काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस झाला, तर काही ठिकाणी तो नको तितका पडला. विशेषतः पेरणीच्या वेळी पाऊसच नसल्यामुळे पेरण्या किती दिवस लांबवणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. तर खरिपाची कापणी जवळ आल्यावर प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले.
यावेळी खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल आणि गाठीला चार पैसे येतील, अशी आशा लक्षावधी शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. निदान नजीकच्या भविष्यकाळात शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू संपतील, अशी आपण आशा करूया.