विद्यापीठ बंद? चक्क दोन तास? घोर अनर्थ! विद्याग्रहण करण्याच्या केंद्राला ग्रहणादिवशी ग्रहण? हे पाहा, कोविडच्या काळात आमचं ओरिजिनल विद्यापीठ अठरा-वीस महिने बंद होतं. आम्ही तक्रार केली? कोविडनंतर बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दल आम्ही अवाक्षर उच्चारलं? बिलकूल नाही! ज्या गोष्टी कुणाच्याच हातात नसतात, तिथं आम्ही समजून घेतोच. पण व्हॉट्सऍप नावाचं आमचं लोकप्रिय विद्यापीठ क्षणभर जरी बंद ठेवलंत तरी आम्हाला चालायचं नाही.
कुणी म्हणालं, काल व्हॉट्सऍपवर सायबर हल्ला झाला. कुणी म्हणालं, सर्वर फेल झाला… काही का असेना? दोन तास व्हॉट्सऍप नाही, याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होतं, याचा अंदाज आहे का कुणाला? लक्षात ठेवा, एक वेळ आम्ही “विद्यार्थी’ वगैरे आहोत हे आम्ही विसरू शकू; पण आम्ही “यूजर’ आहोत हे आम्ही क्षणभरही विसरू शकणार नाही. “यूजर’ असणं हा आमच्या अस्मितेचा भाग आहे.
बारा-चौदा वर्षांपूर्वी जेव्हा व्हॉट्सऍप आणि इतर ऑनलाइन विद्यापीठं अस्तित्वातच नव्हती, तेव्हा लोक काय करत असतील, वगैरे भंपक प्रश्न आम्हाला अजिबात विचारायचे नाहीत. त्यावेळच्या लोकांचं होत असेल समाधान त्यांच्या त्यांच्या विद्यापीठातून मिळणाऱ्या धड्यांनी… आमचं नाही होणार! उद्या तुम्ही जंगलातल्या गुरूकुलातल्या आठवणी सांगाल. आम्हाला चालणार नाही!
गुरूकुलांपासून विद्यापीठांपर्यंत सर्वकालीन शिक्षणसंस्थांनी आत्यंतिक सपक ज्ञान दिलं. तथाकथित संशोधनांसाठी पीएच.डी. दिल्या. विषयातला हा तोचतोपणा संपवला तो आमच्या व्हॉट्सऍप विद्यापीठानं! शुद्ध व्यवहारातलं ज्ञान “गरजेप्रमाणं’ द्यायला सुरुवात केली. पारंपरिक विद्यापीठाला आमच्या मताची काडीची किंमत नसते. कुणाला मान्य असो अथवा नसो, आम्ही तेच शिकवणार, हा पारंपरिक विद्यापीठांचा हेका असतो.
एकदा एक गोष्ट सत्य म्हणून गृहित धरली की ती कायम सत्यच ठरते. एखादी असत्य म्हणून अडगळीत टाकली की कायम अडगळीतच जाऊन पडते. अहो, पण आमच्या व्हॉट्सऍप विद्यापीठाची थोरवी पाहा..! तिथं आमच्या मताला किंमत आहे. आम्हाला जे सत्य वाटतं, तेच सत्य मानण्याची मुभा आहे. समविचारी विद्यार्थ्यांचे “वर्ग’ बनवलेले आहेत.
सत्यासत्यतेच्या पलीकडे जाऊन त्या वर्गांमधून आम्हाला हवं तेच ज्ञान भरभरून मिळतं. आमचे विचार आणि मतं अधिकाधिक पक्की होत जातात. तुम्हाला काय वाटलं विचार “प्रगल्भ’ वगैरे करणं हा शिक्षणाचा हेतू आहे की काय? बिलकूल नाही! विचार “पक्के’ करणं हा शिक्षणाचा हेतू असायला हवा आणि ही संधी आम्हाला केवळ व्हॉट्सऍप विद्यापीठातच मिळते. पारंपरिक विद्यापीठात विचार ठोकळेबाज बनवले जातात.
माणूस ओळखायला शिकवणं हा तर व्हॉट्सऍप विद्यापीठाचा “यूएसपी’ आहे. कोणतंही पारंपरिक विद्यापीठ आम्हाला हे शिकवत नाही. व्हॉट्सऍप विद्यापीठामुळेच आम्ही “आपले-परके’ ओळखू लागलो. “आपल्यां’ना जवळ करू लागलो. “परक्यां’ना खड्यासारखे दूर ठेवू लागलो. मुलं पळवणारी टोळी आम्ही अचूक ओळखतोच; पण तिचा परस्पर निःपातही आम्ही करू शकतो. ही “गटशक्ती’ पारंपरिक विद्यापीठातून मिळत नाही. म्हणूनच सांगतो… सबब कोणतीही असो, व्हॉट्सऍप विद्यापीठ क्षणभरासाठीही बंद राहता कामा नये.