महादेव जाधव कोंढवा, दि. 12 – राज्यात गेल्या दिड-दोन महिन्यांपूर्वी नाट्यमय राजकीय घडामोडी घडून सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपा व शिंदेगटाने सत्ता स्थापन केल्याने आगामी पुणे मनपा निवडणुकीवरही याचा मोठा परीणाम होत असल्याचे दिसुन येत आहे. पुन्हा नव्याने प्रभाग रचना होऊन तिन ऐवजी चारचा प्रभाग होणार आहे, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासुन निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुकांची मोठी अडचण झाली आहे, नव्याने समाविष्ट गावांतील अनेक इच्छुक तीनच्या प्रभाग रचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासुन मोठ्या जोमाने कामाला लागले होते. बैलगाडा शर्यती, क्रिकेट स्पर्धा, होममिनिस्टर असे लाखो रुपयांचे भरगच्च कार्यक्रम घेऊन तसेच स्वखर्चाने विकासकामे करून स्वतःचे वातावरण निर्मिती करीत होते. परंतु, सत्तांतरामुळे पुन्हा नव्याने प्रभागरचना होणार असल्याने कोणता भाग जोडला जाणार व कोणता भाग तोडला जाणार? याचा काहीच अंदाज येत नाही. त्यातच दररोज नव्याने काहीना काही “निर्णय’ झाल्याच्या वावड्या उठत आहेत, त्यामुळे काल काय ऐकलं ते खरं आहे का? असा प्रश्न विचारत समाविष्ट गावांसह उपनगरांतील इच्छुकांनी वेट ऍड वॉच तसेच ऐनवेळी मिळेल तेथून निवडणूक लढवू, अशी भूमिका घेतली आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावरच बघु.., अशीही चर्चा इच्छुकांत आहे.
खर्च तर करावाच लागतोय…
पूर्व हवेली तालुक्यातील फुरसुंगी, उरुळीदेवाची, हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी या समाविष्ट गावांतून प्रथमच पालिका निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण प्रबळ दावेदार आहेत. परंतु, गेल्या दोन वर्षांपासुन जोरदार तयारी करूनही निवडणूक रेंगाळल्याने लाखो रुपये खर्च करुन देखील काही उपयोग होत नसल्याने “भावी नगरसेवक’ नाराज आहेत. निवडणुकांचा कार्यक्रम वारंवार पुढे-पुढे किंवा स्थगिती, प्रभाग रचना रद्द, ओबीसी आरक्षण या कारणांमुळे कोणताच ठाम निर्णय घेता येत नसले तरी इच्छुकांना खर्च करावाच लागत आहे.
निवडणूक बहुरंगीच होणार…
शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. पूर्व हवेली तालुक्यात काही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत. तर, उद्धव ठाकरे यांना या भागातून कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ मिळत आहे. मुळ शिवसैनिक अजुनही ठाकरे यांच्या बाजुने आहेत. सर्वाधिक इच्छुक व तिकिटासाठी रस्सीखेच असणाऱ्या प्रभाग 46 मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदेगट, कॉंग्रेस, मनसे, भाजपाचे इच्छुक “आतून’ तयारी लागले आहेत. मात्र, काहींनी शांत राहण्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक बहुरंगी होणार हे निश्चीत मानले जात आहे.