कर्जत (प्रतिनिधी) – करोनाला घाबरू नका, त्याच्यासोबत जगायला शिका असा सल्ला देताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यंत्रणेतील मर्यादाही बोलावून दाखविल्या. क्वारंटाइन केलेले लोक नावालाच क्वारंटाइन असून ते रात्री आपापल्या घरी जाऊन झोपतात, असे वक्तव्यही त्यांनी केले.
राशीन येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. विखे यांनी ही विधाने केली. “डॉक्टर म्हणून सल्ला देत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय गोष्टींवरही भाष्य केले. कोल्हापूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या जास्तीत जास्त चाचण्या घेतल्याने तेथे रुग्णांची संख्या एकदम वाढली. आपल्या नगर जिल्ह्यात आपण असा प्रकार केला नाही.
तसे केले तर रुग्णांचा आकडा वाढेल,’ असं ते म्हणाले. ‘करोनाला धाबरू नका असे सांगतानाच, मी एकुलता एक असूनही अशा वातावरणात बाहेर फिरतो आहे. ज्यांना जगायचे आहे, त्यांनी स्वत: निर्बंध घालून फिरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. गर्दी आणि संपर्क टाळणे हाच करोनाची लागण रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. त्याच दृष्टिकोनातून देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळेच एखाद्याला करोनाची लक्षणे दिसल्यास त्याला तात्काळ क्वारंटाइन केले जाते.
साधारण दिवस त्यानं इतरांपासून वेगळं राहावं हा उद्देश त्यामागे असतो. ग्रामीण भागात अशा प्रकारे अनेकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.पुण्या-मुंबईतून आलेल्यांनाही गावाबाहेरच्या शाळेत किंवा समाज मंदिरात ठेवलं जात आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या या नियमांचं पालन होत नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. खा. विखे यांनी हीच गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली आहे.