कॉंग्रेस, बसपाचा सुपडा साफ
नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्या निकालांनी भाजपचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले. त्या पक्षाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांची सत्ता राखली. तर, आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार मुसंडीने पंजाबमध्ये सत्ताबदल घडवला. दिल्लीनंतर पंजाबची सत्ता काबीज करून राष्ट्रीय पातळीवर आगेकूच करण्यास सज्ज असल्याचा राजकीय इशारा आपने इतर पक्षांना दिला आहे.
आताचे निकाल कॉंग्रेसच्या दृष्टीने सर्वांत धक्कादायक ठरले आहेत. पंजाबची सत्ता गमवावी लागल्याने त्या पक्षाच्या हाती आणखी राजकीय पीछेहाट आली. निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या इतर राज्यांतही कॉंग्रेसच्या पदरी निराशाच पडली. ताज्या निकालांतून तीन प्रमुख निष्कर्ष पुढे येतात.
भाजपचा राजकीय दबदबा कायम, कॉंग्रेसची राजकीय घसरण सुरूच आणि आपमुळे देशाच्या राजकीय नकाशात बदलाची शक्यता हे ते निष्कर्ष. संबंधित विधानसभा निवडणुकांकडे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांचे निकाल पाहता देश पातळीवर भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांना आपली ताकद आणखी वाढवावी लागणार असल्याचे सूचित होत आहे.
सलग दुसऱ्यांदा भाजप सत्तेवर
लखनौ, दि. 10 -उत्तर प्रदेशची सत्ता सलग दुसऱ्यांदा काबीज करण्याची किमया भाजपने करून दाखवली. राजकीयदृष्ट्या देशातील सर्वांत महत्त्वाचे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशची सत्ता राखणे सोपे जाणार नसल्याचे सर्व अंदाज भाजपने फोल ठरवले. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत.
सरकार स्थापण्यासाठी आवश्यक बहुमताचा जादुई आकडा 202 आहे. तो पल्ला भाजप आणि मित्रपक्षांनी आरामात पार केला. एकट्या भाजपने 250 चा आकडा पार केला. समाजवादी पक्ष (सप) भाजपला कॉंटे की टक्कर देईल, असे भाकीत केले जात होते. मात्र, तसे घडले नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील जागांचे अंतर जवळपास दुप्पट ठरले.
दुसऱ्या राज्यात आपची सत्ता
चंडिगढ, दि. 10 -अवघ्या दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाने (आप) राजकीय चमत्कार घडवताना देशातील दुसऱ्या राज्याची सत्ता काबीज केली. तो पक्ष दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये सरकार स्थापण्यास सज्ज झाला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. तब्बल तीन-चतुर्थांश जागा जिंकून आपने त्या राज्याची सत्ता मिळवली. आपच्या धडाक्यापुढे इतर पक्षांची शब्दश: धूळधाण उडाली. सत्तेबाहेर जाव्या लागलेल्या कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसच्या पाचपट जागा आपने खिशात घातल्या. इतर पक्षांची स्थिती आणखीच केविलवाणी झाली. दुसऱ्या राज्याची सत्ता मिळवणारा आप राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
गोव्यात भाजपला मगोपची साथ
पणजी, दि. 10 -गोव्यात विधानसभेमध्ये बहुमत भाजपने मिळवले असले तरी हे काठावरचे बहुमत असणार आहे. म्हणून भाजपने अन्य राजकीय पक्षांचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या 40 पैकी 20 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि अन्य 3 अपक्षांचीही मदत घेतली जाणार आहे, असे गोव्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तनवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मगोप आणि अपक्षांकडून भाजपला पाठिंबा देण्याची पत्रे भाजपला मिळाली आहेत, असे तनवडे यांनी सांगितले. पंजाबमध्ये मुसंडी मारणाऱ्या आपने गोव्यात आपले खाते उघडले आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपचा मोठा विजय
डेहराडून, दि. 10 -उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवत भाजपने निर्विवाद विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने 18, बसपाने 2 आणि अन्य 2 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या या विजयाला गालबोट लागले ते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या पराभवाचे. धामी यांना खातिमा विधानसभा मतदारसंघातून साडेसहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी दोन वेळा ते सलग विधानसभेवर निवडून आले होते. भाजपला मोठा विजय मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्र्याचाच पराभव झाल्यामुळे आता भाजपला उत्तराखंडमध्ये नवीन मुख्यमंत्री शोधावा लागणार आहे. गेल्या वर्षीच धामी यांच्यावर पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती.
मणिपूरमध्ये भाजपने मिळवले बहुमत
इंफाळ, दि. 10 -मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. विधानसभेच्या 60 जागांपैकी 32 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. अन्य 16, एनपीपी 7, कॉंग्रेस 5 जागांवर विजय मिळवला आहे. तृणमूल कॉंग्रेसने मणिपूरमध्ये शिरकाव करण्याचा पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. या पक्षाला मणिपूरमध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. भाजपचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हेंगांग येथील जागेवरून 18 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी पक्षाच्या धोरणांना आणि कार्यकर्त्यांना देऊ केले आहे. भाजपने मणिपूरमध्ये फुटबॉलची चांगली टीम तयार केली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विजयी मिरवणुकांवरची बंदी मागे
देशातील करोना विषयक स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील मतमोजणीनंतरच्या विजयी मिरवणुकांवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाचही राज्यांमध्ये विजयी राजकीय पक्षांना आपल्या विजयाचा आनंद साजरा करता आला. आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा होत असतानाच म्हणजे एप्रिल 2021 मध्ये निवडणूक आयोगाने विजयी मिरवणुकीवर बंदी घातली होती. या निवडणुकांनंतरही उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या राज्यांमधील निवडणुकांच्यावेळीही निवडणूक आयोगाने ही बंदी कायम ठेवली होती. मात्र, वर्तमानकाळात या राज्यांमधील कोविड-19 शी संबंधित स्थितीचा आढावा घेतल्यावर ही बंदी उठवण्याचा निर्णय आज जाहीर केला.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपला फायदा
विधानसभांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा भाजपला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. अन्य राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाल्याचा फायदा अधिक असणार आहे. राष्ट्रपती म्हणून भाजपकडून जो उमेदवार निश्चित केला जाईल, त्याच्या विजयासाठी मोठी मदत उत्तर प्रदेशातून मिळणे अपेक्षित आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ या वर्षी 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे. त्यानंतरच्या राष्ट्रपतींसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधींचे संख्याबळ पुरेसे असणे महत्त्वाचे होते. जर उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल समाजवादी पार्टीच्या बाजूने गेला असता. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाजपला बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस पार्टी या अन्य पक्षांच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागले असते.