चंदीगड – पंजाबमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीनंतर शनिवारी भगवंत मान मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत 25 हजार पदांची सरकारी नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 10 हजार नोकर्या पोलिस विभागात असतील, तर उर्वरित 15 हजार नोकर्या इतर विभागात असतील. ही नोकर भरती प्रक्रिया महिनाभरात राबवली जाईल, असे ठरवण्यात आले आहे. दरम्यान, भगवंत मान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पंजाबमधील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते.
आज मान मंत्रिमंडळात दहा नव्या चेहऱ्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. याच्या तीन दिवस आधी शहीद भगतसिंग यांच्या गावात भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंदीगड येथील पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. हरपाल सिंग चीमा आणि गुरमीत सिंग मीत हरे वगळता इतर आठ जण पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. दिरबाचे आमदार, चीमा यांनी प्रथम शपथ घेतली, त्यानंतर मंत्रिमंडळातील एकमेव महिला आणि मलोतच्या आमदार डॉ. बलजीत कौर यांनी शपथ घेतली.
त्यापाठोपाठ जंदियाला येथून हरभजन सिंग, मानसातून डॉ. विजय सिंगला, भोवा येथून लाल चंद, बरनाळा येथून गुरमीत सिंग मीत हेअर, अजनाळा येथून कुलदीप सिंग धालीवाल, पट्टीतून लालजीत सिंग भुल्लर, होशियारपूरमधून ब्रह्मशंकर झिम्पा आणि आनंदपूरमधून हरजोत सिंग बैंस यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 पदे आहेत. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यावेळी उपस्थित होते. पंजाबचे राज्यपाल पुरोहित यांनी बुधवारी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
मंत्रिमंडळात पक्षाने माळव्यातील पाच, माझातील चार आणि दोआबा विभागातील एका आमदारांना प्रतिनिधित्व दिले आहे. दिरबा, जंदियाळा, मलोत आणि भोवा या राखीव जागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तसेच, चरणजित सिंग चन्नी, काँग्रेसचे नवज्योत सिंग सिद्धू, प्रकाश सिंग बादल आणि एसएडीचे सुखबीर सिंग बादल आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यासारख्या दिग्गजांचा पराभव करणाऱ्या आप आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.