पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेत पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने सलग दोन विजय मिळवले. रायगड पँथर्स संघाने सनसनाटी विजय मिळवत स्पर्धेत गुणांचे खाते उघडले.
गंभीरचं पुन्हा एकदा विराटबाबत खोचक वक्तव्य; म्हणाला,”शतक ठोकणे चांगले पण….”
पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार जय दुधाणे याच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने प्रतापगड टायगर्स संघाचा २५ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने ११३ धावांचे आव्हान उभे केले. कर्णधार जय दुधाणे याने ५७ धावांची तर, अमित खेडेकर याने ३१ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना प्रतापगड टायगर्स संघाचा डाव ८८ धावांवर मर्यादित राहीला. विनय राऊल याने नाबाद ३२ धावांची तर, हृषीकेश जोशी यांनी २२ धावांची खेळी केली.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अजिंक्य जाधव याच्या खेळीमुळे रायगड पँथर्स संघाने प्रतापगड टायगर्स संघाचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतापगड टायगर्स संघाने १० षटकात ११० धावा फटकावल्या. विनय राऊळ (३६ धावा), हृषीकेश जोशी (३२ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने शंभर धावांपेक्षा जास्त धावा धावफलकावर लावल्या. अजिंक्य जाधव (२६ धावा), अर्थव वाघ (२६ धावा) आणि ऋतुराज फडके (नाबाद २४ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे रायगड पँथर्स संघाने हे आव्हान ९.५ षटकात पूर्ण केले आणि स्पर्धेत संघाचे खाते उघडले.
सिद्धांत मुळे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने शिवनेरी रॉयल्स् संघाचा ९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना हार्दीक जोशी (२० धावा), सिद्धांत मुळे (१७ धावा) आणि आकाश पेंढारकर (१४ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने १० षटकात ८५ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानासमोर शिवनेरी रॉयल्स् संघाचा डाव ७६ धावांवर मर्यादित राहीला. संदीप जुवाटकर (२३ धावा), कृणाल पाटील (१८ धावा) आणि अभिजीत कवठाळकर (१३ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.