Gautam Gambhir – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये सलग दोन शतके झळकावली आहेत. मागील महिन्यात त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक केले होते. त्यानंतर आता सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात विराटने दमदार शतकीय खेळी साकारली होती. यासह त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५ वे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर आंतराराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वच फॉरमॅटमधील हे त्याचे ७३वे शतक ठरले आहे.
टीम इंडियाच्या मिशन ‘ODI वर्ल्डकप 2023’साठी हे 28 खेळाडू दावेदार; जाणून घ्या सविस्तर!
टीम इंडियाने कोलकाता येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर चार गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने प्रहम फलंदाजी करताना २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असल्याने हे लक्ष्य भारतासाठी सहज पार होण्यासारखे नव्हते. भारताकडून केएल राहुलने शेवटपर्यंत टिकून राहत नाबाद ६४ धावा केल्या आणि भारताने हा सामना जिंकला. त्याअगोदर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६७ धावांनी मोठा विजय नोंदवला होता. त्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीची चमक पाहायला मिळाली होती. त्याने अवघ्या ८७ चेंडूत ११३ फाटकावल्या होत्या. विराटने त्याच्या या खेळीने क्रिकेटविश्वातील अनेक विक्रमांना मोडीत काढले.
टीम इंडियाच्या मिशन ‘ODI वर्ल्डकप 2023’साठी हे 28 खेळाडू दावेदार; जाणून घ्या सविस्तर!
एकदिवसीय विश्वचषक यंदाच्या वर्षातच भारतात खेळला जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीची कामगिरी अश्याप्रकारे सुधारणे हे संघासाठी चांगले संकेत आहेत. मागील तीन वर्षात विराटच्या बॅटमधून एकही शतक आपले नव्हते. मात्र, मागील काही काळात त्याने टी-२० मध्ये एक आणि एकदिवसीयमध्ये दोन असे तीन शतके झळकावली आहेत. भारताला मागील महिन्यात बांगलादेशविरुद्ध झालेली ३ सामन्याची एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने गमवावी लागली होती. याच कारणामुळे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने पुन्हा एकदा विराट कोहलीला टोला लगावला आहे.
गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यावेळी माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी विराटच्या सध्याच्या फॉर्मबाबत चर्चा केली. यावेळी गौतम गंभीरला त्याची ही चर्चा आवडली नसल्याचे दिसले आणि त्याने पुन्हा विराटला मागील कामगिरीवरून टोला लगावला. त्याने म्हटले की, “कोहलीचे लक्ष ‘वैयक्तिक कामगिरी’पेक्षा सामूहिक कामगिरीवर असायला हवे. भारताने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली होती हे आपण विसरू नये. होय, वैयक्तिक खेळी महत्त्वाची आहे, वैयक्तिक शतके महत्त्वाची आहेत. जेव्हा तुमच्या रेकॉर्डचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही ५० शतके केलीत किंवा १०० केलीत हे खूप छान वाटते. पण बांगलादेशमध्ये जे घडले ते तुम्ही कधीही विसरू नये. कारण हा एक मोठा धडा आहे.”
गंभीरने पुढे म्हटले की, “भारतीय संघ आपल्या प्रमुख खेळाडूंचा समावेश असतानाही बांगलादेशमध्ये हरलो. केवळ सध्याच्या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मागील पराभवातून काहीतरी शिकले पाहिजे, असे मला वाटते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते विसरता कामा नये.” पहिल्या सामन्यात शतक झळकावलेला विराट दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मात्र फ्लॉप राहिला. तो फक्त ४ धावा करून श्रीलंकन गोलंदाज लाहिरू कुमाराचा बळी ठरला. टीम इंडिया सध्या मालिकेत २-० ने आघाडीवर असून दोन्ही संघामधील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.