हरवू नको, पार संपू नको रे
पुन्हा नव्याने, खेळ मांडू सख्या रे
चुकली गणिते, चुकले नकाशे
तरी येऊ दे सोबतीचे उखाणे
दुनियेस जरी झोळी रिती दिसे ही
शिदोरीस अनुभवाच्या, सर कशाची न येई
जरी लागते अन्न पोटास काही
मना गाभाऱ्यास पैसा न कामास येई
दुःखाची तमा त्या नको बाळगू तू
सुखाची च व्याख्या बदलू चला रे
अंतरीच्या जगी येवो आनंदाला उधाण
सज्ज होऊ उभारण्या ढिगाऱ्यातुनी मनोरे
शेवटाला साऱ्याची बेरीज शून्य आहे
महोत्सव जगण्याचा पार पाडू चला रे
गुलमोहर सुखाचा बहरू दे तव दारी
रंग नवे उधळ तू, पंख पसरून घे रे
– अनुराधा कदम