पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात वाढ होण्यास सुरुवात होताच पाणी कपात मागे घेण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होत असली तरी या पुढे केवळ एकच वेळ पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका सध्या शहरासाठी प्रतीदिन 1,350 एलएलडी पाणी जलसंपदा विभागाकडून घेत आहे. या पाण्याचा वर्षभराचा हिशेब केल्यास हे पाणी तब्बल 17 टीएमसी होते. तर महापालिकेचे शहरासाठीची वाढीव पाण्याची मागणी ही 17 टीएमसीच आहे. त्यामुळे शासनाने पालिकेस हा वाढीव पाणीकोटा मंजूर केला तरी, पालिकेस सध्या एवढेच पाणी शहरासाठी घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शहरात सध्या कोणतीही कपात लागू नसल्याने कोणती कपात मागे घ्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
राज्य शासनाने महापालिकेस फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रतिवर्ष 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. या मंजूर कोट्या एवढे पाणी घ्यायचे झाल्यास पालिकेस शहरात प्रतिदिन 982 एमएलडी एवढाच पाणीपुरवठा करणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात शहरातील लोकसंख्या, पाणी गळती आणि पाण्याचा वापर लक्षात घेता, शहरातील नागरिकांना एकवेळ आणि पुरेसे पाणी द्यायचे झाल्यास महापालिकेस प्रतिदिन सुमारे 1,430 एमएलडी पाण्याची गरज आहे. तर या पाण्याचे नियोजन केल्यास पालिकेस प्रतिदिन 1,350 एमएलडी पाणी एका दिवसाला आवश्यक आहे. पालिकेने यानुसारच पाणी घेतल्यास वर्षभरात महापालिकेस 17 टीएमसी पाणी होते. तर पालिकेची शासनाकडे सुधारित पाणी कराराची मागणी तेवढीच आहे. त्यामुळे धरणे भरली तरी, वर्षभर पालिकेला 1,350 टीएमसीच पाणी मिळणार असून त्याचे नियोजन करायचे झाल्यास पालिकेला दिवसातून एकच वेळ पाणी देणे शक्य असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
कपात कोणती मागे घ्यायची
महापालिकेकडून ऑक्टोबर 2018 पर्यंत शहरात दोनवेळा पाणीपुरवठा केला जात होता. हा पुरवठा फक्त मध्यवर्ती पेठांमध्ये होता. तर उर्वरित शहरात एकवेळ पाणी होते. पालिकेने ऑक्टोबर 2018 नंतर पेठांमध्ये एकच वेळ पाणी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने काही भागांत 5 तास सुरू असलेला पुरवठा 2 तासांनी कमी करून इतर भागांत पाणी वळविले. त्यामुळे शहरात एकवेळ पाणी चालू आहे. त्यामुळे कोणती कपात मागे घ्यायची असा प्रश्न अधिकारीच उपस्थित करत आहेत.