पुणे – महाराष्ट्र कारागृह विभागाने बंदीजनांसाठी राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची महाअंतिम फेरी दि.13 जून रोजी येरवडा कारागृहात होणार आहे. स्पर्धेत राज्यातील 29 कारागृहांतील बंदीजन सहभागी झाले होते. यामध्ये कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृहांतील संघांची प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी निवड झाली असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.
गुप्ता म्हणाले, “महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बंदीजनांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. स्पर्धेत येरवड्यासह 29 कारागृहांमधील बंदीजन सहभागी झाले होते. यामध्ये बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि नगर जिल्हा कारागृह संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी बंदीजनांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाअंतिम फेरीत प्रथम येणाऱ्या संघास “ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक’ आणि प्रमाणपत्र, द्वितीय संघास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.’ ही माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.
महाअंतिम फेरीत सहा
संघांचे साडेतीनशे बंदीजन सहभागी होणार आहेत. यामुळे त्यांचा बंदोबस्त, देखरेख आणि सुरक्षा आदी सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे. महाअंतिम फेरी येरवडा कारागृहाच्या सभागृहात होणार आहे.
प्रकाश धारिवाल व कुटुंबीयांचेही सहकार्य
या स्पर्धेत सहभागी कारागृहांना सौ. दिना व प्रकाश धारिवाल यांच्यावतीने स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ 100 पुस्तकांचा संच, हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची प्रतिमा देण्यात येईल. याद्वारे प्रकाश धारिवाल व कुटुंबीयांनी समाजसेवेची परंपराही जपली आहे.