पुणे – मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत महिनाभरात रेल्वे स्टेशनवर पळून आलेल्या 125 मुलांना पुन्हा घराची उब मिळवून देण्यात आली आहे. त्यांचे समुपदेशन करत त्यांची पालकांसोबत पुन्हा भेट घडवून आणली. दरम्यान मागील आठ महिन्यांत मध्ये रेल्वे विभागातून 858 मुलांची सुटका करण्यात आली आहे.
कुटुंबात किरकोळ भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगले जीवन किंवा शहराचे आकर्षण यामुळे अनेक मुले-मुली रेल्वेने पळून येतात. पळून आल्यावर राग शांत झालेला असतो, खिशात पैसे नाही, अनोळशी शहरात रहायचे कसे असा अनेक द्विधा मनस्थितीत ही मुले असतात. ही मुले रेल्वे स्टेशन किंवा परिसरात फिरतात, किंवा बसलेले असतात. यावेळी आरपीएफच्या जवानांना ही बालके आढळून येतात.
गेल्या आठ महिन्यांत रेल्वे कर्मचारी, आरपीएफ यांच्या समन्वयाने 858 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 591 मुले आणि २६७ मुलींचा समावेश आहे. यावेळी चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांचा शोध घेतला जातो. मुलांचे समुपदेशन करून त्यांची पालकांसोबत पुन्हा भेट घडवून आली जाते. त्यांना घरी पाठविले जाते.
विभागनिहाय सुटका केलेल्यांची संख्या
– मुंबई : 157 मुले आणि 95 मुली
– भुसावळ : 148 मुले आणि 90 मुली
– पुणे : 198 मुले आणि 8 मुली
– नागपूर : 58 मुले आणि 53 मुली
– सोलापूर : 21 मुले आणि 51 मुली