रेठरे बुद्रुक- रेठरे खुर्द, ता. कराड गावचे सुपुत्र आणि सैन्यदलाच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील 267 इंजिनिअर रेजिमेंटचे जवान अनिल कळसे यांचे मणिपूरमध्ये बुधवारी (दि. 20) एका दुर्घटनेत निधन झाले. सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना कळसे यांच्या अंगावर झाड कोसळले. त्यांचे पार्थिव उद्या, दि. 23 रोजी सकाळी रेठरे खुर्द येथे आणण्यात येणार असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. जवान अनिल कळसे यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीयांसह ग्रामस्थ शोकसागरात बुडाले.
याबाबत माहिती अशी, रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे हे सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील 267 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सध्या ते मणिपूरमध्ये कार्यरत होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात अतुलनीय कामगिरी केली होती. ते 29 सप्टेंबर 2000 रोजी सैन्यदलात भरती झाले. 2017 साली ते निवृत्त झाले होते; परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. ते पुढील वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते. पुढील महिन्यात ते सुट्टीवर गावी येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते. त्यांचा मुलगा आर्यन हा इयत्ता पाचवीत, तर मुलगी श्रद्धा इयत्ता नववीत शिकत आहे. वडील सुट्टीवर येणार असल्याचे समजल्यापासून दोन्ही मुले आनंदात होती. त्यांचे मूळ गाव रेठरे खुर्द आहे; परंतु त्यांचे कुटुंबीय आगाशिवनगर येथील श्री साई रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास आहे.
अनिल कळसे यांचा स्वभाव शांत, संयमी, प्रेमळ होता. त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त समजताच, त्यांची पत्नी व मुलांच्या सांत्वनासाठी मित्रमंडळी व नातेवाइकांनी श्री साई रेसिडेन्सीमध्ये गर्दी केली होती. त्यांच्या मूळ गावी रेठरे खुर्द येथे गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, मणिपूरमध्ये सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. त्यावेळी जवान अनिल कळसे यांच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. अनिल कळसे यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरा पूर्ण झाली. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) सकाळी रेठरे खुर्द येथे आणले जाणार असून, जाई मोहिते प्रशालेजवळ त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.